महाराष्ट्रातील सूक्ष्मदर्शी ज्यू
महाराष्ट्रातील सूक्ष्मदर्शी ज्यू
अल्पसंख्यांक म्हणून भारतामध्ये मुसलमान, ख्रिश्चन, पारसी, शीख, बौद्ध व जैन या सहा समाजांना मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र सरकारने येथील ज्यू धर्मीयांना तशी मान्यता २२ जून २०१६ रोजी दिली. ज्यू समाज त्या निर्णयाची गेली अनेक वर्षें वाट पाहत होता. स्वाभाविकच, तो समाज आनंदित झाला आहे. ते लोक महाराष्ट्रात खरोखरी अल्पसंख्य म्हणजे बारा कोटी लोकसंख्येमध्ये फक्त दोन-चार हजारांच्या दरम्यान आहेत. पश्चिम बंगालने तेथील ज्यू लोकांना अल्पसंख्याक ही मान्यता दहा वर्षांपूर्वी दिलेली आहे. त्यावेळी तेथे फक्त सत्तेचाळीस ज्यू नागरिक होते! महाराष्ट्र हे ज्यू धर्मियांना मान्यता देणारे भारतातील दुसरे राज्य आहे.
अल्पसंख्याक या उपाधीच्या मान्यतेमुळे त्यांना विवाह नोंदणी, मृत्यू नोंदणी करणे सुलभ होईल. तसेच, त्यांना शैक्षणिक संस्था सुरू करता येतील, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि ‘विकास निधी’ मिळवता येईल. अल्पसंख्याकांना त्यांच्या ऐतिहासिक स्थानांचे रक्षण करण्यासाठी खास तरतुदी आहेत त्यानुसार ज्यू समाज त्यांच्या तशा स्मृतिस्थळांचे जतन प्रभावी रीतीने करू शकेल.
महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक विभागाच्या सचिव जयश्री मुखर्जी म्हणतात, की ज्यू धर्मीयांना तशी मान्यता या आधीच द्यायला हवी होती, कारण त्यांची लोकसंख्या फारच कमी आहे.

Comments
Post a Comment